Monday, December 8, 2014

मी फक्त 'माणसं' ऐकतो.

I remind myself every morning: Nothing I say this day will teach me anything. 
So if I'm going to learn, I must do it by listening.
- Larry King


रामभाऊ आमच्या सोसायटीत राहतात.
आमच्या सोसायटीत काही कमी म्हातारी माणसं नाहीत. पण रामभाऊ त्या लोकांमध्ये जास्त रमत नाहीत. बघावं तेव्हा रामभाऊ तरुण पोरांच्या घोळक्यात. त्यातल्या त्यात, माझं आणि त्यांचं जरा बरं जमतं.
वय वर्ष बहात्तर. वयोपरत्वे केसांची सुतरफेणी झालेली पण मन पिस्ता बर्फीसारखं - हिरवंगार !

परवा रामभाऊ गेटवर उभे असलेले दिसले. त्यांना लांबून हात केला आणि त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो.
'काय म्हणताय रामभाऊ ?'
'.............' रामभाऊंनी मुक्यानेच हात मिळवला, हसले आणि डोळे मिटून घेतले.
'झाला का फुटबॉल खेळून? आज कोण जिंकलं?' रामभाऊंना बोलतं करायचं म्हणून मी काहीतरी विचारलं.
रामभाऊ गप्पच.
रामभाऊंना काय झालंय समजेना. 'उद्या भेटू' म्हणत मी तिथून पळ काढला.

काल रामभाऊ पुन्हा भेटले ते सोसायटीतल्या शाळकरी मुलांच्या घोळक्यात. पोरांना भोवरा फिरवण्याचे प्रशिक्षण देणे चालू होते. मी आल्याचं रामभाऊंना समजलं असावं. मुलांना भोवरा फिरवायचा एक 'गृहपाठ' देऊन रामभाऊ माझ्यासमोर उभे राहिले.
'आलात खर्डेघाशी करून ?' चुना आणि तंबाखू मळून-मळून ब्राऊन झालेला हाताचा पंजा टाळीसाठी पुढे करत रामभाऊंनी विचारलं.
'रामभाऊ, गरीबाच्या जखमेवर मीठ चोळू नका.' मी टाळी न देत म्हटलं. रामभाऊ एकटेच मोठ्यांदा हसले.
'ते जाऊ दे ! काल काय झालेलं तुम्हाला ?' मी विषयाला थेट हात घालत म्हटलं.
'अरे काल माझा उपास होता.' काहीतरी आठवल्यासारखं करत रामभाऊ म्हणाले.
'तुमचा मंगळवारी उपास असतो ते माहित आहे मला. पण त्या उपासाचा आणि तुमच्या न बोलण्याचा काय संबंध ?'
'सांगतो. मी दर मंगळवारी 'बोलण्याचा' उपास करतो.' रामभाऊ म्हणाले.
'काय सांगताय रामभाऊ ! आणि अगदीच बोलायची वेळ आली तर ?'
'बोलण्यावाचून गत्यंतर नाही अशी वेळ आली तरच बोलतो.'
'म्हणजे तेवढ्यापुरता उपास मोडता.' मी रामभाऊंना पेचात घेत म्हटलं.
'नाही. माझ्या उपासातली ती 'साबुदाण्याची खिचडी' आहे असं मानतो.’ रामभाऊ माझ्याकडे शांतपणे बघत म्हणाले.
‘रामभाऊ, हे सगळं कशासाठी ?’
'तुला ती गणपतीच्या देवळातली गोष्ट सांगितली का ? सांगतो. गेली साठ वर्ष दर मंगळवारी उपास करतोय. मंगळवारी मी गणपतीच्या देवळांत गेलो नाही तर उद्याचा बुधवार पाहू शकणार नाही, इतकी नियमितता.
दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. गणपतीसमोर मांडी घालून बसलो होतो. गणपतीच्या मूर्तीचं निरीक्षण करत होतो. काय विचार असेल या गणपतीच्या प्रतीकामागे? आणि अचानक नजरेत भरले गणपतीचे सुपाएवढे कान! गणपती म्हणजे ‘गणांचा पती’. आताच्या भाषेत 'लीडर' ! लीडरने ‘बोलण्या’हून अधिक 'ऐकायचं' असतं हेच सुचवायचं असेल का यातून ?
मनात हजार विचार. मग लक्षात आलं की मनात येणारे विचार मी कुठेतरी 'ऐकतो' आहे. हे इतकी वर्ष सुचलं कसं नाही?
मग सकाळी उठून 'आवाज ऐकत’ बसायचा छंदच जडला.
भिंतीवरून टिक-टिक ऐकू आली. पाहिलं तर घड्याळाचा आवाज! शेजारच्या घरातून कुकरची शिट्टी ऐकू आली. लांबवर कुठूनतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. कुणाच्या तरी घरात गजर झाला. कुणाच्या घरात बादली पाण्याने भरत होती. एखादा आंघोळ करता करता रफी-किशोर झाला होता !
तेव्हा लक्षात आलं की आपल्या सभोवतालचे आवाज मी 'ऐकत' नव्हतो. न 'चावता गिळत' होतो. तर अशी ही गंमत !'

'म्हणजे दर मंगळवारी आता 'दूरदर्शन' ऐवजी 'आकाशवाणी' का ?' मी मस्करीच्या स्वरात विचारलं.
'नाही. दर मंगळवारी मी फक्त 'माणसं' ऐकतो. आपल्या भोवतालची माणसं बोलण्यासाठी किती आसुसलेली आहेत ! Everyone has story to tell ! भाजीवाले, रिक्षावाले, पोस्टमन, इस्त्रीवाले, बस कंडक्टर, पोलीस वगैरेंशी एकदा कधीतरी कामाव्यतिरिक्त बोलून बघ. सोडावॉंटरचं झाकण ओपनरने उघडावं तशी ही माणसं फसफसून बोलायला लागतील की नाही ते बघ. त्यांच्या रोजच्या समस्या नुसत्या ऐकल्यास तरी तू थकशील, पण ते तसेच बोलत राहतील. एक सांगू ? त्यांच्या समस्या तू सोडवणार नाहीस हे त्यांनाही माहित असतं. त्यांची तशी अपेक्षाच नसते मुळी. त्यांचं एकच अपेक्षा असते - आम्हाला ऐका !’

बराच वेळ आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. शांतता ऐकण्यात हरवून गेलेल्या रामभाऊंच्या पाठीवर हलकेच थोपटून मी घराच्या दिशेने चालू लागलो.

न्यूज चैनल्स, नेते, टीव्हीवरील परीक्षक, धर्मगुरू, ज्योतिषी, तुम्ही, मी.... जो तो बोलतोय !
मग ऐकतंय कोण ?
चेकौव्ह्ची 'द ग्रीफ' नावाची एक अप्रतिम लघुकथा आहे.
या कथेचा नायक एक गरीब टांगेवाला आहे. ज्या दिवशी कथा घडते त्याच्या आदल्या दिवशीच टांगेवाल्याचा तरुण मुलगा मरण पावला आहे. परंतु पोटात लागलेल्या भुकेमुळे टांगेवाल्याला दुःख करत बसायला वेळ नाही. टांगा घेऊन तो कडाक्याच्या थंडीत धंदा करायला बाहेर पडला आहे. त्या दिवशी टांग्यात बसणाऱ्या प्रत्येकाला टांगेवाला त्याच्या मुलाच्या मृत्यूबद्दल काही सांगू पाहतो. पण त्या टांग्यात बसणारे प्रवासी त्याला काही बोलू देतील तर ना !
प्रत्येक प्रवासी स्वतःचं वैयक्तिक दुःख पुढे रेटून टांगेवाल्याला काही बोलूच देत नाहीत. कथेच्या शेवटी -
टांगेवाला जड मनाने आपल्या घरी परतला आहे आणि आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूची कहाणी आपल्या घोड्याला सांगत बसला आहे !

आजची सद्यस्थिती पाहता, लोकांचे एकमेकांशी असलेले तुटक संबंध पाहता, वो दिन दूर नही की नाक्यानाक्यांवर माणसांना फक्त 'ऐकून घेणारी' आणि मिनिटांचे पैसे आकारणारी 'लिसनिंग स्टोअर्स' उघडावी लागणार आहेत.
...आपण ती वेळ नको आणूया.
सोडावॉंटरच्या बाटलीप्रमाणे ती 'फसफस' मनात दाबून कितीतरी जण आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. त्या बाटलीचं झाकण उघडायला आपण त्यांना फक्त मदत करायची आहे, इतकंच. आपण त्यांना ऐकू लागलो की आपल्यालाच लक्षात येईल की इतके दिवस त्यांना कुणी ऐकून घेतलं नाही हीच त्यांची खरी समस्या होती !

असं नाही झालं तर रामभाऊंना उपासासाठी आठवड्याचा एक मंगळवार देखील कमी पडणार आहे.
रामभाऊंचं आता वय झालंय. त्यांच्यावरचा ताण आपण जमेल तसा कमी करूया.
एवढं तरी 'ऐकाल' ना माझं ?


No comments:

Post a Comment